वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र : राज्यपाल रमेश बैस
नाशिक / वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासोबतच उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे आणि खुल्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावे, असा मोलाचा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला. संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षान्त समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संदीप विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झा, चेअरमन डॉ. संदीप झा, उप कुलगरु डॉ. राजेंद्र सिंन्हा, माजी खासदार प्रभात झा, अलोक झा, आर्यन झा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.राज्यपाल रमेश बैस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज या व्यासपीठावर सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे, त्यांचेदेखील यावेळी विशेष अभिनंदन. अशा कार्यक्रमांमधूनच आजच्या युवा पिढीशी संवाद साधता येतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल व त्यांना मिळालेल्या पदवीसाठी त्यांचे अभिनंदन केले.
