देशभरातील बेरोजगार औपचारिक शिक्षण न घेतलेल्या तरुणांचा होणार सर्व्हे
देशभरातील बेरोजगार व औपचारिक शिक्षण न घेतलेल्या तरुणांचे सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत (रासेयो) हे सर्वेक्षण केले जाणार असून, त्याच्या अहवालानुसार या प्रकल्पाची पुढील दिशा ठरणार आहे.
बेरोजगार तरुण तसेच शिक्षण नसल्यामुळे कौशल्यांपासून वंचित राहिलेल्या तरुणांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ‘रासेयो’ संलग्नित महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दत्तक गावांमध्ये नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर या उपक्रमादरम्यान घेतले जातील. तसेच संबंधित गावांमधील औपचारिक शिक्षण न झालेल्या व नोकरीत नसलेल्या युवकांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. हे अर्ज केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाकडे जमा केले जाईल. काही वर्षांत वाढलेल्या बेरोजगारीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याची माहिती ‘रासेयो’ विभागामार्फत देण्यात आली.
