खुशखबर! २०२६ मध्ये भारतात १० ते १२ लाख नव्या नोकऱ्यांची संधी; ‘या’ क्षेत्रांत होणार बंपर भरती
मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी २०२६ हे वर्ष रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आशादायक ठरणार आहे. ‘टीमलीज’ (TeamLease) या नामांकित स्टाफिंग संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, २०२६ मध्ये देशभरात १० ते १२ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. २०२५ मधील ८ ते १० लाख नोकऱ्यांच्या तुलनेत ही वाढ मोठी मानली जात आहे.
प्रमुख कंपन्यांचे भरती नियोजन
भारतातील दिग्गज कंपन्यांनी २०२६ साठी आपली कंबर कसली असून, विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे:
-
EY India: जून २०२६ पर्यंत सुमारे १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे उद्दिष्ट आहे. यात ‘कॅम्पस रिक्रूटमेंट’वर अधिक भर दिला जाईल.
-
टाटा मोटर्स: हायटेक तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी टेक्नॉलॉजी, हायड्रोजन इंधन आणि सॉफ्टवेअर-डिफाइन्ड व्हेईकल्स या क्षेत्रांत इंजिनिअर्स आणि संशोधकांची भरती करणार आहे.
-
मोतीलाल ओसवाल: तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि एआय (AI) सपोर्ट फंक्शन्समध्ये नवीन नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे.
या कौशल्यांना असणार सर्वाधिक मागणी
भविष्यातील गरजा लक्षात घेता कंपन्यांनी केवळ पदवीपेक्षा विशेष कौशल्यांवर (Specialized Skills) भर देण्याचे ठरवले आहे: १. डिजिटल स्किल्स: सप्लाय चेन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधील तज्ज्ञ. २. ग्रीन एनर्जी: बॅटरी तंत्रज्ञान आणि इंधन संशोधनातील तज्ज्ञ. ३. तंत्रज्ञान: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट.
विविधता आणि समावेशकतेवर (DEI) भर
यावेळच्या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे कंपन्यांनी केवळ आकड्यांवर लक्ष न देता सामाजिक समावेशकतेला प्राधान्य दिले आहे.
-
गोदरेज कन्झ्युमर: २०२७ पर्यंत महिला, दिव्यांग आणि LGBTIQA+ समुदायाचे प्रतिनिधित्व ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
-
डियाजिओ आणि मोतीलाल ओसवाल: महिला नेतृत्वाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत.
