*महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड*
*महिला बचतगटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप*
औरंगाबाद / महिला बचतगटाने तयार केलेल्या विविध उत्पादनाला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज दिले. सर्वसामान्य, कष्टकरी तसेच गरजूंना उद्योगासाठी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा अधिकाधिक लाभ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महिला बचत गटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कराड बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे , बँकेचे विभागीय व्यवस्थापक महेश डांगे, बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक जयश्री देशमुख, एसबीआयचे जितेंद्र ठाकूर, गणेश कुलकर्णी, औरंगाबाद मनपाचे उपायुक्त देवरे आदी उपस्थित होते. देशात बँकेच्या माध्यमातून विविध योजनांमधून नागरिकांना कर्जपुरवठा करण्यात येत असून कर्जाची परतफेड होते आहे, ही महत्त्वाची बाब आहे. यामध्ये महिला लाभार्थ्यांची संख्या अधीक आहे. महिला काटकसरीने व नियोजन करून बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत आहेत. आपल्याला कर्जासाठी बँकेत जाण्याऐवजी बँकेचे प्रतिनिधीच आपल्याकडे येत आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. महानगरासह जिल्हयातील बचतगटाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही डॉ.कराड यांनी सांगितले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी राज्यात मोठया प्रमाणात बँकां पुढे आल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांच्यासाठी स्वनिधी योजना आहे. प्रथम 10 हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर 20 हजार व त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज देण्यात येईल. योजनेतून फळविक्रेते, भाजीविक्रेते तसेच फेरीवाले व छोटे व्यावसायिक यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी ही योजना आहे. देशात मोठया प्रमाणात जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचविणे शक्य झाले. प्रधानमंत्री आयुषमान भारत योजना, उज्वला गॅस योजना यासह विविध योजनेतून सर्वसामान्यांना आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बँकेचे विभागीय व्यवस्थापक महेश डांगे यांनी बॅकेच्या माध्यमातून आज 500 कोटी रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगून पीएम स्वनिधी अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटपाविषयी माहिती दिली. यावेळी महिला बचतगट तसेच विविध उद्योजक यांच्यासह पात्र लाभार्थीना कर्ज धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी पीएम स्वनिधी लाभार्थी, नागरिक, बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
